अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी दि. ७ मार्च रोजी जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी ढगे तसेच जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत हे तातडीने कृषी विभागात दाखल झाले. त्यांच्याच मध्यस्थीने नंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता झाली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भगाळे, भाऊसाहेब पाटील, हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, योगेश पाटील, गिरीश वराडे, किशोर चौधरी आदी उपस्थित होते. जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन पुकारले. त्यामुळे हादरलेल्या कृषी विभागाने येत्या २५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे यांनी त्यासंदर्भात लेखी पत्र देखील दिले. दरम्यान, दिलेल्या मुदतीत पीएम किसानचा प्रश्न न सोडविल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.