विद्यार्थी सहायक समितीतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान
जळगाव (प्रतिनिधी) :- जगापुढे पर्यावरणीय बदल ही मोठी समस्या निर्माण झाली असून त्याबाबत आवश्यक तेवढी जनजागृती होत नाहीये. उत्तराखंड राज्यात केदारनाथ भागात शास्त्रज्ञांनी बांधकाम करू नका असे सांगितले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तेथे पुराने मोठे मानवी हानीचे नुकसान होत आहे. अनेक माणसे मारली जात आहे. निसर्गाचे मनुष्य अमाप नुकसान करीत असल्याने व पर्यावरणीय बदल होत असल्याने मानवाला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, माजी खा. कुमार केतकर यांनी केले.
येथील विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहायक समिती, जळगावतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. सुनीलकुमार लवटे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार, माजी खा.कुमार केतकर, स्त्रीवादी विचारवंत शारदा साठे, विद्यार्थी सहायक समितीचे सचिव डी.एन.पाटील, माजी प्राचार्य डॉ. एस.एस.राणे उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील,लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला पूजन करून दीपप्रज्वलन केले. प्रस्तावनेतून प्राचार्य डॉ. राणे यांनी विद्यार्थी सहायक समितीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच गेल्या २५ वर्षांत समितीची सुरुवातीपासूनची आजवर असलेली वाटचाल कथन केली. यानंतर ॲड. प्रकाश सपकाळे, अभियंता हरीश बोरसे, प्रतिक्षा कल्पराज या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कमवा व शिका योजनेतून अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळाला. अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडले. त्यांचे जीवन उजळून निघाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कुमार केतकर यांनी “कुंडली अस्वस्थ जगाची” याविषयी मांडणी केली. त्यांनी सांगितलं की, समाजसुधारकांनी केलेलं काम हे सिव्हिल सोसायटी वर्क म्हणता येईल. अनेक संस्थांचे मिळून हे काम सुरू आहे. जग आता कोणत्या अस्वस्थतेतून जात आहे याबाबत मराठी वृत्तवाहिन्या वस्तुस्थिती मांडत नाही, ही शोकांतिका आहे. जगातील शांतताप्रेमी शास्त्रज्ञांनी एका मासिकातून जागतिक धोक्याची सूचना दिली आहे. जगाला अणुशस्त्रांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच, सोशल मीडियातून फिरणाऱ्या खोट्या माहितीमुळेदेखील जगात अस्वस्थता पसरत आहे, असेही माजी खा. कुमार केतकर म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून डॉ.लवटे यांनी सांगितले की, मध्यमवर्गीय समाज समृद्ध झाला, हे खरे आहे. महाराष्ट्रात ६०- ७०च्या दशकात सामाजिक काम कुटिरोद्योगसारखी होती. पूर्वीचा काही दशकांपूर्वीचा महाराष्ट्र काटकसरीने वागत होता. सुधारकांच्या सुधारणा परंपरेचे काम विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून जळगावात सुरू आहे, असेही प्रा.डॉ.लवटे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आता समाजातील व्यक्तींनी पुढे आले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. आभार यू.डी. चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी सहायक समितीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









