पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : सततची नापिकी व अतिपावसामुळे यंदा देखील उत्पन्न हातातून जाण्याची शक्यता यामुळे कर्ज कसे फेडायचे; या विवंचनेत शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हि घटना हिरापूर शिवारात घडली आहे. सदरची घटना २२ सप्टेंबरला दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)महेंद्र यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत महेंद्र असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
सकाळी घरी कोणाला काही न सांगता महेंद्र हे घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.(केसीएन)दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रेय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.