प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; विश्वजित पाटलांच्या नेतृत्वाखाली ‘रास्तारोको’
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील पाळधी गावानजीक आज बुधवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. प्रशासकीय ढिसाळपणा आणि हायवेवरील अनियंत्रित वेगामुळे उत्तम परदेशी (वय ५४) या निष्पाप व्यक्तीचा जागीच अंत झाला, तर अन्य तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. या भीषण घटनेनंतर पाळधीतील ग्रामस्थांचा संयम सुटला असून, संतप्त नागरिकांनी महामार्गावर ‘रास्तारोको’ करत प्रशासनाला धारेवर धरले.


पाळधी गाव महामार्गाला लागूनच असल्याने या ठिकाणी वाहने नेहमीच सुसाट असतात. आज दुपारी एका भरधाव वाहनाने नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्यांना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, उत्तम परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य तिघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पाळधी परिसरात वारंवार अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “येथे गतिरोधक बसवा आणि हायवेवरील अतिक्रमण हटवा,” अशी मागणी वारंवार करूनही ती फेटाळली गेली. महामार्गालगतच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून, हा भाग आता खऱ्या अर्थाने ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्वजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे जळगाव आणि संभाजीनगरकडे जाणारी शेकडो वाहने अडकून पडली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
“जोपर्यंत गतिरोधकांचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही आणि परदेशी परिवाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही!”
— विश्वजित पाटील (स्थानिक नेते)









