जळगाव (प्रतिनिधी) – ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी युवक समता परिषदेच्यावतीने रविवार रोजी सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करुन सुटका केली.
राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 27 महानगरपालिकेच्या एकूण 2736 जागांमधून 740 जागा कमी होत आहेत. 128 नगरपंचायती व 241 नगरपालिकामधल्या 7493 जागांपैकी 2099 जागा कमी होणार आहेत.
34 जिल्हापरिषदेतील 2000 जागांपैकी 535 जागा तर 351 पंचायत समितीमध्ये 4000 जागांपैकी 1029 जागा कमी होणार आहेत 27782 ग्रामपंचायतमध्ये अंदाजे 1,90,691 जागांपैकी 51486 जागा ओबीसी संवर्गातील कमी होत आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. यामुळे सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज असल्याने, सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या युवक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी समता परिषद युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, यांच्यासह मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाजन धरणगाव,शालिग्राम मालकर,ज्ञानेश्वर महाजन जळगाव, धनराज माळी सर,राजेंद्र महाजन,युवक आघाडीचे महानगराध्यक्ष हेमरत्न काळुंके,उपाध्यक्ष नितीन महाजन, संतोष परदेशी, गजानन महाजन कन्हैया देवरे, चंदू माळी, जितेंद्र महाजन यांना पोलिसांकडून अटक व सुटका करण्यात आली.
यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील,राजू पाटील, गौरव महाजन, शिवाजी महाजन, दिलीप महाजन कृष्णा महाजन मयूर माळी शैलेंद्र परदेशी यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.