जळगाव (प्रतिनिधी) – येथील नूतन मराठा महाविद्यालय व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन साहसी प्रशिक्षण अभियान “अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल पी देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहरक्षक दलाचे सहायक समादेशक संजय पाटील, उपप्राचार्य राजेंद्र देशमुख, प्रा.संजय पाटील, प्रा.डॉ.एन जे पाटील, एनसीसी प्रमुख प्रा.शिवराज पाटील, प्रा.हेमाक्षी वानखेडे उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्यात अग्निवीर सैनिक म्हणून निवड झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महापूर,आग, वादळ, बॉम्बस्फोट, घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, वीज पडणे, भूकंप यासारख्या आपत्ती घडत असताना कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या टाळाव्यात याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा हे शिकवले. विद्यार्थ्यांनी विविध परिस्थितींची प्रात्यक्षिके आत्मसात करण्यासाठी या उपक्रमात स्वेच्छेने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवराज पाटील यांनी केले तर आभार प्रा.हेमाक्षी वानखेडे यांनी केले.