जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या भजनांनी गांधी विचारांचे स्मरण करुन सकाळ अल्हाददायक करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने रविवार दि २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पायोजी मैने राम रतन धन पायो, रामा रघुनंदना, वैष्णव जन तो, ठुमक चलत रामचंद्र, राम का गुणगान करीये, या सारख्या भजनांनी आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने गांधी विचारांचे स्मरण करीत आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, प्रा.दांडगे, प्रा.मनोज पाटील, आदी उपस्थित होते. डॉ.अनिल चिकाटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संगीत विभागाचे प्रा.अलका चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.तेजस मराठे, प्रा.शलाका निकम, प्रा.प्रिया महाले, सुयोग गुरव, ईश्वर पाटील, अंकिता अग्निहोत्री यांनी भजन सादर केले. प्रा.विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रदर्शनाचे उद्घाटन
गांधी रिसर्च फाऊंडेशन, गांधी तिर्थ, जैन हिल्स यांच्यावतीने भारतीय स्वतंत्रता की गाथा यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याहस्ते प्रदवीप्रदान सभागृहात झाले. विद्यापीठातील महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने ४ ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी अशोक चौधरी व प्रमोद जैन यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, डॉ.अनिल चिकाटे आदी यावेळी उपस्थित होते.