७ लाख ५ हजार रुपये बँक खात्यात जमा ; विद्यापीठाचा स्तुत्य निर्णय
नरेश बागडे
जळगाव (प्रतिनिधी) :खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंना कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव यांच्या मान्यतेने रोख बक्षीस विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडून देण्यात आले असून संबंधित खेळाडूंच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे क्रीडा संचालक दिनेश पाटील यांनी केसरीराजला माहिती दिली आहे. शै.वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ, खेलो इंडिया, व क्रीडा महोत्सव (अश्वमेध) स्पर्धेत सुवर्ण,रौप्य व कास्य पदक विजेते खेळाडूंना देण्यात येणारी रोख रक्कम खेळाडूंच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात आली. यात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (सांघिक क्रीडा प्रकार) यात प्रत्येकी सुवर्ण पदक रु.१५ हजार, रौप्य पदक रु. १० हजार, कास्य पदक रु. ५ हजार रुपये आले.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ( वैयक्तिक क्रीडा प्रकार) यात सुवर्ण पदक रु. २० हजार रुपये, रौप्य पदक रु. १५ हजार, कास्य पदक रु.१० हजार तसेच खेलो इंडिया स्पर्धामध्ये सुवर्ण पदक रु.२० हजार, रौप्य पदक रु. १५ हजार, कास्य पदक रु.१० हजार रोख देण्यात आले.
क्रीडा महोत्सव (अश्वमेध)स्पर्धा (सांघिक क्रीडा प्रकार) यात कास्य पदक रु. २ हजार, (वैयक्तिक क्रीडा प्रकार) रौप्य पदक रु.७ हजार, कास्य पदक रु.४ हजार असे शै.वर्ष २०१८- १९ व २०१९-२० मधील प्राविण्य प्राप्त सर्व खेळाडूंना एकूण रक्कम रु. ७ लाख ५ हजार एवढी रक्कम खेळाडूंना देण्यातआले. बक्षीस प्राप्त सर्व खेळाडूंचे व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शा.शि.संचालकांचे दिनेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
खेळाडूंना मिळणार प्रोत्साहन
विद्यार्थ्यांनी मेहनत करून क्रीडा प्रकारात यश मिळविले आणि विद्यापीठाचे नाव कमविले. त्यामुळे त्यांना रोख बक्षीस देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला. यामुळे खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी केसरीराजशी बोलताना दिली.