जळगाव (प्रतिनिधी) = कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीला सामोरे जात असून आज दुसऱ्या दिवशी बुधवार दि.२४ रोजी नॅक पिअर टीम समोर विद्यापीठाच्या प्रशासन, वित्त व लेखा विभाग आणि परीक्षा विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक- कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.
नॅक पिअर टीम विद्यापीठात तीन दिवस असून आज दुसऱ्या दिवशी सकाळी हया टीमसमोर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी अनुक्रमे वित्त, प्रशासन आणि परीक्षा विभागाचे सादरीकरण केले. त्यानंतर माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बैठका घेवून संवाद साधला. त्यानंतर या समितीने आरोग्य केंद्र, केंद्रीय विद्यालय, मुलींचे वसतिगृह, शॉपींग कॉम्पलेक्स आदी ठिकाणी भेटी दिल्या.
शिक्षक भवन येथे माजी कुलसचिव व माजी परीक्षा नियंत्रक, माजी बीसीयुडी संचालक, माजी वित्त व लेखाधिकारी, प्रशाळा संचालक, अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र व गांधी तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक यांच्याशी चर्चा केली. दुपारच्या सत्रात विद्यार्थी कल्याण, राष्ट्रीय सेवा योजना, ज्ञानस्त्रोत केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर सर्व प्रशाळांना या समितीने भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली. नॅकच्या पिअर टीममध्ये चेअरमन म्हणून आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. दिलीप चंद्रा नाथ, सदस्य समन्वयक प्रा. प्रशांत कुमार (बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी), सदस्य प्रा. के. जयप्रसाद (केंद्रीय विद्यापीठ, कसारागोड, केरळ), प्रा. अभय आनंद बौराई (हेमवती नंदन बहुगुणा, गढवाल, केंद्रीय विद्यापीठ, उत्तराखंड) यांचा समावेश आहे.