सहकारमंत्र्यांच्या गावात शस्त्रक्रिया झाल्यावर झोपवले चक्क जमिनीवर…
पुणे (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर आरोग्य केंद्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर दिवसभर चक्क जमिनीवर झोपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे “निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान” अशी जाहिरात करणारे शिंदे सरकारमधील सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील, त्यांच्याच गावातील हे आरोग्य केंद्र आहे.
निरगुडसर हे दिलीप वळसे पाटील यांचे गाव आहे. येथे ४८ महिला उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३० निरगुडसर आणि १८ धामणी आरोग्य केंद्रात दाखल होत्या. या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर महिलांना खाली जमिनीवर झोपवण्यात आले. याबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले की, शासन आमच्या दारी, योजनेअंतर्गत सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र, या आरोग्य केंद्रात साध्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना योग्य सुविधा मिळत नसतील, तर सोबत आलेल्या नातेवाइकांचे काय? असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून विचारण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत असतील तर पेशंटची सोय बघणे देखील महत्त्वाचे आहे. शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णाला खाली सतरंजीवर झोपवण्यास, आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत बोलताना डॉ. शारदा यांनी सांगितले की, एकूण ४८ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या असून, ऑपरेशनच्या रुग्णाला भूल असल्याने आम्ही त्यांना गाद्या टाकून खाली झोपवले आहे. दरम्यान, या बातमीमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निर्णय वेगवान म्हणणारे सरकार जेथे आहे, त्या राज्यातील ग्रामीण भागातील जनता आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.