जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना ‘‘ओमिक्रॉन’’ विषाणु संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर, 2021 पासून जिल्ह्यात निर्बध लागू करण्यात आले आहेत .
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार लग्न समारंभ : बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा होणारे लग्न समारंभ केवळ 50 लोकांच्या मर्यादेत साजरे करता येतील . सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक आणि मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरे करता येतील . अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येईल.
जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संयुक्तीकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
शासन निर्देशानुसार कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्ती व घटक यांच्यावर पोलीस विभाग व संबधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करावी या आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.