दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीमध्ये करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेडची कोणतीही कमतरता नसून, लक्षणं असलेल्या एकाही रुग्णालाकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये अशी ताकीद मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

दिल्लीत करोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांकडे रुग्णालयांकडून दुर्लक्ष केले जात असून त्यांना दाखल करून घेतले जात नसल्याचा आरोप होत आहे. अरविंद केजरीवाल यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना काही रुग्णालये बेजबाबदारपणे वागत असून त्यांना सोडले जाणार नाही असा इशाराच दिला आहे.
काही रुग्णालये करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. इतर पक्षात असणाऱ्या आपल्या रक्षणकर्त्यांचा वापर करत बेडचा काळा बाजार करणाऱ्यांना मी ताकीद देत आहे की, त्यांना सोडले जाणार नाही, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी इशारा दिला आहे.
सर्व काही सुरळीत झाल्यानंतर याकडे लक्ष देता येईल. आम्ही याप्रकरणी तपास करु आणि बेड उपलब्ध असतानाही दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्यांविरोधात कारवाी करु. काहीजण बेडचा काळाबाजर करत आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
जर हजारोंच्या संख्येने रुग्ण चाचणीसाठी रांग लावू लागले तर दिल्लीमधील आरोग्य यंत्रणा ढासळेल अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना लक्षणं आहेत फक्त त्यांचीच चाचणी केली जावी, अन्यथा आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा भार येईल असेही त्यांनी सांगितले आहे.







