नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनामुळे यापूर्वी कधीही न बघितलेली परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्णांना बरं करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असून, यात डॉक्टरांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर वैज्ञानिकही करोनावर लस शोधण्याचे काम करत आहे. या दोन्ही आघाड्यांवर काम करणाऱ्या डॉक्टर आणि संशोधकांचे बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

देशात करोनाविरोधातील लढ्यात डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्याचबरोबर करोनावर लस शोधण्याच कामही देशात सुरू आहे. अनेक संस्थामधील संशोधक हे काम करत आहेत. या डॉक्टरांचं बळ वाढवण्याचा प्रयत्न सगळीकडूनच होत असून, बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनीही भारतातील डॉक्टरांचे कौतुक केले आहे. नसरीन यांनी एक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिक खूप चांगले आहेत. माझी मनापासून अशी इच्छा आहे की, सर्वात आधी भारतानं करोनावर लस शोधावी. जगातील ७.८ बिलियन लोकांना ही लस मदत करेल,’ अशा आशावादी भावना तसलिमा नसरीन यांनी भारताविषयी आणि भारतातील डॉक्टरांविषयी व्यक्त केल्या आहेत.
करोनावर लस शोधण्याचं काम जगभरात सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल या देशांप्रमाणे भारतातही करोना व्हायरसला रोखणारे प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. भारतात एकूण ३० समूह करोनाचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सहा लस प्रकल्पांवर विशेष लक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्याशिवाय आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या १० वेगवेगळया औषधांचा करोनावरील उपचारांमध्ये वापर सुरु आहे. सध्या ही औषधं चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.जगभरात ५५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना करोनाची लागण झाली असून ३.५० लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे







