मुंबई (वृत्तसंस्था) – देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. सध्या सर्वांच्या गरजेची असणारी औषधे आणि सर्जिकल संबंधित असणाऱ्या गोष्टी मुंबईत कमी प्रमाणात येत असल्यामुळे आणखी आठ दिवसांनी त्यांचाही तुटवडा जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन झाल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये औषध, हॅण्ड ग्लोव्ज, पीपी किट यांची मागणी वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये होलसेल विक्रेत्यांकडे जेवढा साठा उपलब्ध होता तो कमी वेळेतच विकला गेलेला आहे. आता नवीन वस्तू पुन्हा मुंबईत मागवायचा झाल्या, तर त्या विविध राज्यांमधून मागवाव्या लागत आहेत. मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनी हा माल वितरकांकडे पोहोचवण्यासाठी तयार होत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टीचा पुरवठा सुरळीत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. भाजीपाला, दूध, धान्य यांचे वितरण सुरु आहे. तसेच औषधांचे वितरण हे सुरु आहे. मात्र राज्या बाहेर असणाऱ्या विविध फॅक्टरीमध्ये तयार असलेला माल मुंबईत आणण्यासाठी कोणीही तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरातील काही महत्त्वाच्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना परवानगी देऊन राज्यभरातील फॅक्टरीमध्ये तयार असलेली औषध, हॅण्ड ग्लोज तसेच सर्जिकल संदर्भात असणाऱ्या वस्तू यांचा पुरवठा करुन द्यावा अशी मागणी होत आहे.