जनमानस गंभीर नसल्याने गोंधळलेले प्रशासन सैरभैर
रूग्णवाढीचा वेग धोकादायक टप्प्यावर गेल्याने राज्यभर बदनामी


कोरोना संसर्गात जळगाव शहर व जिल्हा लोकसंख्येची तुलना करता राज्यातील अन्य महानगरांच्या बरोबरीने आकडेवारी गाठतो आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या पंधरा दिवसांत रूग्णसंख्या फारशी नसताना लोकांमध्ये जो बिनधास्तपणा होता तो आजही तसाच असल्याने प्रशासनाची गोची होते आहे हे खरे असले तरी अपुरे मनुष्यबळ व अर्धवट व्यवस्था आणि यंत्रणेने गोंधळलेले प्रशासन आणखीनच सैरभैर झालेले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की, वाढत्या आकड्यांनी प्रशासनातील प्रत्येकाचे नैतिक बळच हरवून घेतलेले दिसते आहे. त्यामुळे रूग्णवाढीचा वेग धोकादायक टप्प्यावर गेल्याने राज्यभर जळगाव शहर व जिल्ह्याची बदनामी होते आहे. जिल्हा प्रशासनाला जे समजून घेणारे नेतृत्व लागते ते नेतृत्व येथे पुढे आलेले नाही . आणिबाणीच्या या परिस्थितीत नेहमीसारखे कागदांना बांधील राहणारे अधिकारीच जास्त असल्याने जे थोडेफार धडपडीचे आहेत त्यांनाही पाठबळ मिळत नाही.
नेहमीच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेबद्दलच्या सरकारी अनास्थेतही या अपयशाची बिजे दिसत असली तरी या कठीण परिस्थितीत साधकबाधक विचारांची कुवत नसणे, नेहमीची सरकारी पठडी सोडून लवचिकतेने काम करण्यासाठी यंत्रणा राबविण्याचे कौशल्य नसणे या बाबी वरिष्ठ सरकारी अधिकार्यांच्या पातळीवर जळगाव जिल्ह्याचा घात करत आहेत. याच एक प्रकारच्या उदासिनतेतून थेट जनतेपर्यंत या आजाराचे शास्त्रीय वास्तव नेमक्या व प्रभावी मार्गाने नेण्यात जळगाव जिल्ह्याचे प्रशासन अपयशी ठरलेले आहे. या प्रशासकीय अपयशाने सामान्य जनतेतील बिनधास्त मानसिकता पुर्वी होती तशीच आजही कायम आहे. म्हणून जनमानस गंभीर नसल्याने गोंधळलेले प्रशासन सैरभैर झालेले दिसते आहे. सध्या पूर्ण राज्यात जो बर्याच प्रमाणात राजकीय पुढार्यांचा अलिप्तपणा दिसतो आहे तो जळगाव जिल्ह्यातही आहे. थेट लोकांपर्यंत प्रशासन पोहचलेले नाही त्यामुळे आलेले रूग्ण तपासणे हे डॉक्टरांचे काम व लोकांनी गर्दी करू नये म्हणून त्यांना आवरणे हे पोलिसांचे काम ; एवढाच खबरदारीच्या सगळ्या सुचनांचा अर्थ घेतला जातो आहे. आधीच लोकाभिमुखता हरवलेले व लोककल्याण या शब्दाचा अर्थ फक्त डिंग्या मारण्यापुरताच ठेवणारे या जिल्ह्याचे प्रशासन लोकांना वाचवण्यासाठी वेगळे काही काम करू शकते की नाही?, याची शाश्वतीच लोकांना राहीलेली नाही.
जिल्ह्यात सध्या जो रग्णसंख्यावाढीचा वेग आहे तो पाहता व प्रशासन असे आलेला दिवस ढकलण्याच्या भूमिकेत असेल तर आता दिवसाला शंभर -सव्वाशे रूग्ण वाढण्याची भिती लोक व्यक्त करू लागले आहेत. अमळनेर , भडगाव ,पाचोरा, भुसावळ , जळगाव शहरानंतर आता रावेर, जामनेर जळगाव ग्रामीण हा भाग कोरोनाच्या विळख्यात जाताना दिसतोय. शेजारचा धुळे जिल्हाही या आजाराशी झगडत असल्याने पारोळा व एरंडोल हे तालुके धोक्याबाहेर असल्याचे कुणीही म्हणणार नाही. अमळनेर, भडगाव ,पाचोरा, भुसावळ तालुक्यांमधील कोरोना प्रसाराची कारणे आणि पार्श्वभूमी तपासून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी प्रशासनाच्यापातळीवर कुणीही घेताना दिसत नाही . जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलिस अधीक्षक , वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, महापालिका आयुक्त आदींच्या बैठका होण्यापलिकडे लोकांना थेट भिडणार्या हालचाली अथवा उपायांची पावले उचलली जातान दिसतच नाहीत. रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येणारे यंत्रणेचे विदारक अनुभवही आता हळूहळू चर्चेत येऊ लागले आहेत. त्यामुळेच कोरोनाचा सामूहिक मुकाबला बाजुला राहून प्रशासनाविरोधातील लोकांची नाराजी रस्त्यावर येण्यास आता फार वेळ लागणार नाही. त्यामुळे कुठे फेडणार ही पापे , हा तळतळाट व्यक्त करण्यापलिकडे आपण कहीच करू शकत नाही या व्यथेने सामान्य माणूस हतबल झालेला आहे, हे मात्र नक्की .







