नवी मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील दिग्गजांवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. कधी नेपोटीझमचा, तर कधी दबावतंत्राचा, तर कधी हुकूमशाहीचा आरोप बॉलिवूडमधील दिग्गज स्टार कलाकारांवर होत आहे. आता, बिहारमधील एक लोक गायकाने थेट सलमान खानवर आरोप केले असून सलमानच सुशांतच्या मृत्युला जबाबदार असल्याचे सुनील छैला बिहारी यांनी म्हटलंय.

सुनिल छैला बिहारी यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ जारी करत, सुशांतला गेल्या महिनाभरापासून धमक्या देण्यात येत होत्या, असा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुशांतसिंह राजपूत त्रस्त होता, सातत्याने धमक्या मिळत असल्याने तो घाबरला होता. त्यामुळेच, तो सतत आपला मोबाईल नंबर बदलत असे. एका महिन्यात त्याने तब्बल 50 वेळा आपलं सीमकार्ड बदललं आहे. मात्र, सीमकार्ड बदलल्यानंतरही सुशांतला धमक्या देण्याचं कमी झालं नाही.
लोकगायक सुनिल यांनी थेट सलमान खान व गँगवर आरोप केला आहे. सुशांतचा मित्र संदीप सिंह दरवेळेस नवीन सीमकार्डचा नंबर सलमान खान आणि त्याच्या गँगकडे देत होता, असे छैला बिहारी यांनी म्हटलंय. त्यानंतर, सलमान खान आपल्या गुंडांच्या माध्यमातून सुशांतला धमकी देत होता, असा थेट आरोप सुनिल यांनी केला आहे. त्यामुळेच, सुशांतने आत्महत्या केली असून याप्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय.
संदीप सिंह सारख्या अभिनेत्यास वाटते की, जोपर्यंत तुम्हाला सलमान खान, एकता कपूर आणि करण जोहरसारख्या लोकांची साथ मिळत नाही, तोपर्यंत बॉलिवूडमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळेच, संदीपसिंह सुशांतची सर्व माहित सलमान खानला पोहोचवत होता. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या तपासणीतही सुशांतसिंह गेल्या महिनाभरापासून सातत्याने सीमकार्ड बदलत होता, अशी माहिती समोर आली आहे.







