मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत. तसेच पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार व्हायरल होत आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, असे या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. मात्र, या पोस्टबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही बातमी पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती पोस्ट केली असून ती फिरविण्यात येत आहे, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन ४.० सध्या सुरु आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कल्याण-डोंबिवली आदी शहरात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरु असताना मुंबई आणि पुणे येथे रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण रोखण्यासाठी शनिवारपासून १० दिवस संपूर्णपणे मुंबई आणि पुणे शहरे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट खोडसाळ आणि चुकीची तसेच अफवा पसरविणारी आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये ७५ हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच २७ नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या १०० होणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल येथे दिली.







