मुंबई (वृत्तसंस्था) – करोनामुळे देशाच्या विविध भागांत अडकून पडलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक यांना त्यांच्या राज्यात परतणे शक्य व्हावे म्हणून विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. मात्र, महाराष्टाला आवश्यक तितक्या गाड्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राजकारण थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’मागील दोन दिवसांपासून रेल्वेमंत्री राजकारण करत आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) ४९ रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सांगत आहेत की, १६ गाड्यांपेक्षा जास्त गाड्या आम्ही सोडू शकत नाही. ४९ गाड्यांच्या हिशोबानं तिथे प्रवासी जमा झाले आणि रेल्वे प्रशासन गाड्या सोडण्यासाठी तयार नाही.
ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला वाटतं रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे विभाग आणि केंद्र सरकार जाणूनबजून राजकारण करत आहे. हे योग्य नाही. ‘एलटीटी’वर जी परिस्थिती निर्माण झाली, त्याला पीयूष गोयल जबाबदार आहेत. ४९ रेल्वे तुम्ही सोडणार होतात. त्या सोडा. प्रवासी येऊन उभे आहेत, गर्दी वाढत आहे. जी परिस्थिती निर्माण होत आहे, त्याची जबाबदारी पीयूष गोयल यांची आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवावेत,’ अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.







