औरंगाबाद – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै कालावधीत लॉकडाऊन होणार आहे. आता लॉकडाऊनची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दुचाकी-चारचाकीवर विनाकारण बाहेर फिरल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (९ जुलै) काढले. त्यानुसार लॉकडाऊन काळात सकाळी फक्त अडीच तास दूध वितरणास परवानगी असेल. वृत्तपत्र प्रतिनिधी, सरकारी तसेच वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच दुचाकी वापरता येईल. सर्व औषधी विक्री दुकानांना २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सव्वा महिन्यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये दुचाकीच्या वापरावर कोणतेही बंधन नव्हते. किराणा दुकाने, भाजी बाजार सुरू होता. त्यामुळे अनेक जण अत्यावश्यक काम आहे, धान्य- भाजी खरेदी करायची, असे म्हणत घराबाहेर पडले. आताच्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्याची दुचाकी जप्त, परवाना रद्द होईल. शिवाय भाजी बाजारही बंद राहणार आहे, असे पांडेय यांनी आदेशात म्हटले आहे.
औषधी दुकाने २४ तास खुली राहणार
> औषधी दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
> अंत्यसंस्कार, अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी आहे.
> घरपोच अन्नपदार्थ, दारू बंद, सकाळी अडीच तास दूध वितरणास परवानगी
> वृत्तपत्र प्रतिनिधी, सरकारी तसेच वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच वाहनाची मुभा
हे असेल बंद
१. घरपोच खाद्य- पदार्थ पुरवठा सेवा २. किराणा दुकाने ३. भाजी बाजार ४. खासगी पेट्रोल पंप ५. हॉटेल, खानावळी ६. सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे ७. सलून्स, पार्लर ८. बांधकामे







