नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.
हल्ल्यात बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील दत्तात्रय काळे (41) हे शहीद झाले आहेत. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत. आज पहाटे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य थांबण्याचे नाव घेत नाही. श्रीनगरमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. शहरातील जूनिमार परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षाबलाने या परिसराला घेरले आहे आणि सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानांतर्गत यावर्षी आतापर्यंत सुरक्षा बलाने 110 हून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मागील वीस दिवसात 36 दहशतवादी मारले गेले आहेत.