80 संशयित रुग्णांचे स्वाब गायब झाल्याची शल्य चिकित्सकांची आरोग्यमंत्र्यांसमोर कबुली !
जळगाव ( प्रतिनिधी )
येथील जिल्हा रुग्णालय भोंगळ कारभाराबद्दल आधीच बदनाम आहे हे सगळ्यांना माहिती आहे तसे अनेक किस्से गाजलेलेही आहेत कोरोनासारख्या युद्धजन्य परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्याचे गांभीर्य नसल्याची संतापजनक बाब बुधवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये 80 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे हे स्वॅबच हरवले आहेत. ते कोणत्या प्रयोगशाळेत पाठवले होते? प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचे अहवाल आलेत का? याबाबतची कोणतीही माहिती यंत्रणेकडे नाही. या बाबत खुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य मंत्र्यांसमोर कबुली दिली.
या विषयावर माजीमंत्री गिरीश महाजन यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत आरोग्य खात्यावर अकार्यक्षमतेचा आरोप केला
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे बुधवारी जळगावच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यांनी जिल्हा नियोजन भवनात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचे अनेक मुद्दे समोर आले. माजीमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या, मृत्यूदर तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये असलेल्या अडचणींच्या मुद्यांकडे आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासन कोरोनाचे नियंत्रण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील संसर्गाचा वेग पाहता स्वॅब घेण्याची कार्यवाही संथगतीने सुरू असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेले 80 संशयित रुग्णांचे स्वॅब गायब झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने या 80 रुग्णांना कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना दाखल केले, त्यावेळी त्यांचे स्वॅबही घेतले होते. मात्र, ते कोणत्या प्रयोगशाळेत पाठवले होते? प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचे अहवाल आलेत का? याबाबतची कोणतीही माहिती नसल्याची कबुली डॉ. चव्हाण यांनी बैठकीत दिली. या मुद्यावरून आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
आढावा बैठक आटोपल्यानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर आगपाखड केली. राज्य सरकारची भूमिका उदासीन आहे. सरकारला गांभीर्य नाहीये. म्हणूनच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. जळगाव जिल्ह्यात बिकट परिस्थिती आहे. कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. अनेक संशयितांच्या स्वॅबचे अहवाल 12 ते 15 दिवस मिळत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे, असेही ते म्हणाले.