मुंबई (वृत्तसंस्था) – रेडा, लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. यावेळी जनतेला दिलासा देण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर येथे मंगळवारी (दि. 19) भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनांतर्गत राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना सुपूर्द केले, त्यावेळी ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, करोना संकट हाताळताना सरकारमध्ये आदेश देताना सुसूत्रता दिसून येत नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यामध्ये अपयशी ठरले असून, आरोग्य व्यवस्था कोलमडलेली दिसून येत आहे. राज्यातील डॉक्टरांना पीपीई किट व इतर साहित्य वेळेवर मिळू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये करोनाचा संसर्ग हा दोन महिने झाले तरी कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच आहे. याविरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे मंगळवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील हजारो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे, यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था विदारक आहे, त्यांना काही प्रमाणात शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज आहे. राज्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना व इतर कर्मचाऱ्यांनाही करोनापासून संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शुक्रवारी (दि. 22) भाजपचे राज्यातील गावोगावचे कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतील, असेही त्यांनी नमूद केले.







