शिरसोली (प्रतिनिधी) – गेल्या कित्येक वर्षांपासून निवेदनांचे हत्यार चालवून विविध प्रश्नांना सरकारदरबारी वाचा फोेडणारे पुनमचंद माळी यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणातील फोलपणावर बोट ठेवत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे.
जवळपास गेल्या 40 वर्षांपासून विविध मुद्द्यांवर निवेदने पाठवून राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून विविध मंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्याचे काम ते अखंड करीत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसलेले पुनमचंदअप्पा आता वयाच्या 70 व्या वर्षीही पदरमोड करून उच्चपदस्थांना आपल्या निवेदनांच्या मुद्द्यांवर विचार करायला भाग पाडत आहेत.
कर्जमाफीच्या धोरणातील फोलपणावर बोट ठेवताना मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चोर सोडून सन्याशाला फाशी असा हा प्रकार आहे. दोन लाखांर्पंतचे शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणामुळे नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांवर अन्याय झालेला आहे. दोन लाखांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करत असेल तर त्याचवेळी नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना दोन लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडून दिले गेले पाहीजे. कर्ज थकवले तरी काही बिघडत नाही, सरकारकडून माफी मिळते अशी भावना बळावून शेतकर्यांनी थकबाकी वाढवली तर बँका संपून जातील. त्यामुळे नियमित परतफेडीची शेतकर्यांची मानसिकताही राहणार नाही. या सगळ्याच बाबाींचा विचार करून शेती क्षेत्रातील सरकारची गुंतवणूक वाढली पाहीजे. शेतकर्यांचा सातबारा पूर्ण कोरा झाला पाहीजे. आपण दिलेल्या या निवेदनाचा लेखी खुलासा मिळावा अशी अपेक्षाही पुनमचंद माळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
विविध विषयांचा व्यासंग, धडपडीने चालू घडामोडींबद्दल स्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी करावा लागणार अभ्यास, प्रशासनाच्या कार्यपध्दतीचे व सरकारच्या धोरणांचे तटस्थपणे मूल्यमापन करून समस्यावर नेमके बोट ठेवण्याची हातोटी लाभलेले पुनमचंदअप्पा व्यवस्थेतील अनेक उणिवांची लिलया चिरफाड करतात , त्यावेळी त्यांच्या समोर कित्येक तरूण अधिकारीही स्तब्ध होतात. माजी राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही त्यांच्या निवेदनांची दखल घ्यावी लागली होती.