वरिष्ठांनी कानाडोळा करू नये ; ठिणगीच्या भडक्याला निमित्त हवे?
जळगाव – ( प्रतिनिधी) –
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असल्याने पोलिसांसह जिल्हा प्रशासनाच्या चुका व खटकणार्या बाबी चर्चेत येत आहेत. या खटकणार्या बाबींमध्ये यावलचे पोलिस निरीक्षक अरूण धनवडे व अमळनेरचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे रडारवर आहेत. अत्यंत अक्षम्य चुका करूनही हे दोन पोलिस अधिकारी केवळ वरिष्ठ अधिकार्यांची त्यांच्यावर मर्जी असल्याने कारवाईपासून निर्धोक असल्याचे खापर लोक प्रशासनाच्या गलथानपणावर फोडत आहेत. सामान्यांपुढे रात्रंदिवस कायद्याचे ज्ञान पाजळणारे पोलिस खाते या दोघांबद्दल एवढे उदार कसे ?, असा प्रश्न विचारत लोक वरिष्ठ पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या दोन्ही अधिकार्यांना पाठीशी घालण्यासाठी त्यांच्या चुकांकडे कानाडोळा करू नये अशी टीका आता करू लागलेले आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या आणिबाणीच्या परिस्थितीत सामुहिक आंदोलने करून प्रशासनावर दबाव टाकता येत नसल्याने शांत बसण्याशिवाय पर्याय नाही अशी लोकांची मानसिकता आहे. याच परिस्थितीचा फायदा या निर्ढावलेल्या अधिकार्यांना मिळतो आहे. महत्वाचे म्हणजे पोलिस खात्यातील सामान्य कर्मचार्यांनाही त्यांच्या वरिष्ठांकडून सध्या कोणतीच सवलत दिली जात नाही व या दोघांना जणू काही घडलेच नाही अशा पध्दतीने पोलिस खात्याकडून सुरक्षित ठेवले जात असल्याने सामान्य पोलिस कर्मचार्यांमध्येही कमालीचा संताप व्यक्त होतो आहे. एकुणच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी या दोघांविरोधातील संतापाच्या ठिणगीचा भडका होण्यासाठी निमित्त मिळू देऊ नये , अशी सूप्त लाट जनमानसात आहे. उघडपणे बोलण्यासाठी किंवा जाहीरपणे संताप व्यक्त होण्यासाठी सध्या संधी नसल्याने लोक शांत राहून निमित्ताची वाट पाहात आहेत.

न झालेल्या बढतीसह बदलीचा गवगवा करीत लॉकडाउनचे उल्लंघन करीत चेल्यांकडून विविध ठिकाणी जाहीर सत्कार घडवून आणल्याने गोची झालेले यावलचे पो.नि. अरूण धनवडे यांच्यासाठी 25 एप्रिल रोजी जमावबंदीचे उल्लंघन करून 200 जणांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता. सवंग लोकप्रियतेच्या नादी लागून पो.नि. धनवडे यांनी केलेले खटाटोप लपून राहीलेले नाहीत. पोलिस खात्यातील अधिकार्याला असे राजकारणी व्यक्तीसारखे उपद्व्याप करावे लागलेले हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे, अशी आता पोलिस खात्याचीही खिल्ली उडविली जाते आहे.
कोरोनाच्या कंटेनमेंट झोन मध्ये असणार्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज पुण्यतिथी आणि पालखी उत्सवाला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर दोन अथवा पाच व्यक्ती उपस्थित राहतील तरच परवानगी देण्यात येईल असे प्रांताधिकार्यानी सांगितल्यानंतरही त्यांचे आदेश धुडकावून पुण्यतिथी पालखी उत्सव शंभरावर लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. याबाबत प्रांताधिकारी श्रीमती अहिरे यांनी आम्ही परवानगी नाकारल्यानंतरही पोलीस प्रशासनाने परवानगी देत बंदोबस्त ठेवला होता, असे सांगितले होते. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी झाल्यावर . जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. लोकांच्या जीवाशी खेळणारा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचा हा परवानगी स्वत:च्या अ्रधिकारात देण्याचा नादानपणा पोलिस खात्यात जसा चर्चेचा मुद्दा ठरला आहे तसाच संताप आता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या गोलमाल भूमिकेबद्दल व्यक्त होतो आहे.
अमळनेरच्या सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती भोई यांनीही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे तक्रार दाखल करून पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
या सर्व प्रकरणांची दखल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे घेतील का ? याप्रकरणी केसरीराजचे संपादक भगवान सोनार यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री ,गृहमंत्री ,मुंबई पोलीस महासंचालक , विशेष पोलीस महासंचालक नाशिक , जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जळगाव आदींकडे ईमेलद्वारे पुराव्यानिशी 1 मे रोजी तक्रार दिली आहे .







