पुणे (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळया अधिकाऱ्यांकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यानुसार प्रशासनाकडून या नागरिकांची यादी तयार करुन संबंधित राज्यांकडे परवानगी घेण्याची प्रक्रीया गतीने सुरू करण्यात आली आहे.
श्रमिक स्पेशल रेल्वेने मागील तीन दिवसांत निवारागृहांतील मध्यप्रदेशच्या 1 हजार 93 मजुरांना उरुळी कांचन येथून रेवा येथे पाठविण्यात आले. तर 1,131 मजुरांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथे विशेष रेल्वेने पाठविण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी देहू येथील तात्पुरता निवारा केंद्रातील 20 नागरिकांना सोलापूर येथे रवाना करण्यात आले. स्वारगेट येथून दोन एसटी बसेसमधून 43 विद्यार्थ्यांना जळगाव येथे तसेच मौजे शिवे येथून 24 कामगारांना हिंगोली, नांदेड येथे रवाना करण्यात आले. कामशेत येथून 110 मजुरांना 5 बसेसमधून लातूर, वाशिम येथे पाठविण्यात आले.
या उपक्रमातून यापूर्वी कोटा (राजस्थान) येथून यापूर्वी 74 विद्यार्थ्यांना पुणे येथे आणण्यात आले. तसेच माऊंट अबू येथे अडकलेल्या 80 साधकांनादेखील विशेष वाहनाने पुण्यात आणण्यात आले. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. लंडनहून मुंबईत आलेल्या विमानाने पुणे जिल्ह्यातील 65 नागरिक आले. या नागरिकांना बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत येथील परराज्यांतील 24 मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी राजस्थान येथे बसमूधन पाठवण्यात आले. राज्यांतर्गत मजुरांपैकी नांदेड जिल्हयातील 38 मजुरांना तीन वाहनांमधून, तर शिरुर येथील तीन निवारागृहांमधील 38 मजुरांना विशेष बसने वाशिम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे.