मुंबई ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरित असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमबीर सिंगच आहेत, असा थेट आरोप केला आहे.
ते म्हणाले की , सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात येत आहे. केंद्रसरकार परमवीरसिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचत आहे. त्यांचे हे कारस्थान कोर्टात उघड होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. सिंग यांचा काय सहभाग होता, पोलीस तपासात काय उघड होणार होतं आणि एनआयए आल्यानंतर तपासावर काय परिणाम झाला यावर मलिक यांनी प्रकाश टाकला आहे.
अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस तपास करत असताना सत्य बाहेर येणार होते. त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला. त्याचवेळी परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली कुरकुरे बालाजी यांच्या ईमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात आले याचाही उल्लेख आहे, अॅडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही एनआयएने चार्जशीट दाखल केली नाही याचा अर्थ केंद्रसरकारकडून परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात सातत्याने साक्षीदार फुटत असल्याची बाब समोर येत आहे ही गंभीर बाब आहे. शहीद हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर दबाव टाकला जात आहे. कोर्टाने या सर्व बाबीची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांच्यावर झालेला हल्ला ही गंभीर बाब आहे. उत्तरप्रदेश सरकारने कडक पाऊले उचलायला हवीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराला येणार्या सर्व नेत्यांची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे त्काळ उत्तरप्रदेशच्या डीजीपींना आदेश देऊन सर्व स्टार प्रचारकांची जबाबदारी उत्तरप्रदेश सरकारने घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.