मुंबई ( वृत्तसंस्था ) – राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सातत्याने एनसीबीवर चौकशीचा बनाव रचल्याचा आरोप करत आहेत. २ ऑक्टोबरला मुंबईत क्रूझवर कारवाई केल्यानंतर नवाब मलिक यांनी हा सगळा एनसीबीनं केलेला बनाव असल्याचा आरोप केला होता .
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अटक करण्यात आलेल्या ८ जणांना देखील चुकीच्या पद्धतीने अटकेत ठेवल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज त्यांनी जावई समीर खान याच्या अटकेसंदर्भात एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १३ जानेवारीरोजी समीर खान यांना अटक करण्यात आली होती.
“माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. संबंधित अधिकाऱ्याचा फोन नंबर देखील दाखवला.
“कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलंय की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे . प्रश्न हा उपस्थित होतो की एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला.
“८ जानेवारीरोजी एनसीबीनं पत्रकारांना सांगितलं की दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोमधून जप्त करण्यात आले. जे करण सजनानीनं विजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीकडे शिलाँगला पाठवायला बुक केलं होतं. ९ जानेवारीला वांद्र्यात करण सजनानीच्या घरी छापा टाकला आणि एनसीबीनं प्रेस रिलीज काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती दिली. त्याच दिवशी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या नंबरवरून प्रेस रिलीज आणि ४ फोटो पाठवले गेले. याच नंबरवरून सगळ्यांना मेसेजेस पाठवले गेले. ९ जानेवारीला शाहिस्ता फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे ७.५ ग्रॅम गांजा सापडला. तिला त्याच दिवशी जामीन दिला गेला. नवी दिल्लीत प्रिन्स पान, हाऊस ऑफ पान, रॉइस पान नोएडा, सांजा पान गुडगाव, नितीन बँगलोर, मुच्छड पानवाला याच्याकडे छापा टाकला गेला”, असं मलिक यांनी सांगितलं.
“१२ तारखेला रात्री समीर खान यांना एनसीबीचं समन्स मिळालं आणि १३ तारखेला १० वाजता बोलावण्यात आलं. समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. संध्याकाळपर्यंत माहिती आली की २७ अ कलमांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. जेल कस्टडीनंतर आमची जामीन याचिका रद्द झाली. ६ महिने पूर्ण झाले तेव्हा सुनावणी झाली आणि एनसीबीनं तेव्हा चार्जशीट फाईल करतो असं सांगितलं. कनिष्ठ न्यायालयात आम्ही जामीन याचिका दाखल केली. साडेतीन महिने एनसीबीनं टाळाटाळ केली. पण शेवटी जामीन मिळाला”, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
“२७ तारखेला एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात समीर खान आणि त्याच्यासोबतच्या दोन इतर आरोपींना साडेआठ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर जामीन दिला गेला. काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या ऑनलाईन पोर्टलवर तो आदेश अपलोड झाला. माझ्या जावयाला साडेआठ महिने जेलमध्ये राहावं लागलं. माझी मुलगी मानसिक धक्क्यामध्ये होती. त्यांच्या दोन लहान मुलांवर परिणाम झाला”, असं देखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.
“सर्व चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याचं दाखवलं जात होतं. पण घराच्या तपासणीत असं काहीही सापडलं नाही. पण माध्यमांना तसं सांगितलं गेलं. लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी बनाव करते. एनसीबीचा हा सगळा बनाव उघड झाला आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.