जळगाव शहरातील नाथवाडा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नाथवाडा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
विजय उर्फ पिंटू हिरामण अहिरे (वय ३९) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते नाथवाडा येथे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह राहत होते. सुभाष चौकात एका दुकानात काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, रविवारी दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी राहत्या घरी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.
आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने विजय उर्फ पिंटू अहिरे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन) यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. अनेक जणांना घटना कळल्यावर भोवळ आली. घटनेमुळे नाथवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.