चोपडा (प्रतिनिधी) – विकासात शिवसेना राजकारण करत नाही केले असते तर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या चोपडा पालिकेला १० कोटी दिले नसते.चोपड्यातील भगवं वातावरण कोणीही बदलवू शकत नाही.गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना भेटायला वेळ नव्हता.परंतु आपण सर्व जिल्हा पिंजून काढत असून जिल्ह्यात कोणीही पाण्याची योजना मागा मी देतो.माझ्याकडे माणसाची तहान भागवण्याचे काम आहे.मी भाजप वाल्यांना देखील पाणी पाजायला तयार आहे.भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जळगावात सभा घेऊन दाखवावी असे आव्हान पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.ते विष्णापूर (ता चोपडा)येथे १४ कोटींच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.यावेळी त्यांनी आमदार लता सोनवणे यांच्या विकासकामांचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार लताताई सोनवणे,माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे जिल्हाप्रमुख समाधान महाजन,तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि प सदस्य हरीश पाटील,माजी उपसभापती एम व्ही पाटील, अडावदचे सरपंच भावना माळी, नगरसेविका मीना शिरसाठ,तहसीलदार अनिल गावीत,गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे,विष्णापूर सरपंच सखुबाई भिल्ल,विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील,शहराध्यक्ष आबा देशमुख,नगरसेवक महेंद्र धनगर, राजाराम पाटील, महेश पवार,किशोर चौधरी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की,१७२ कोटींचा खेडीभोकरी-भोकर पूल महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला पूल उभारला जाणार आहे. नुसता मंजूर नाहीतर टेंडर निघाले आहे.त्याठिकाणी दोनशे मीटर खोलीपर्यंत माती आहे. आयटी इंजिनिअर यांना बोलावून त्यातून मार्ग काढला आहे. हा पूल यापूर्वी होऊ शकत नव्हता का.? आता तर तीन पायाचे सरकार आहे. यात तर फार अडचणी यायला पाहिजे पूर्वी तर एकसंघ सरकार होते.माजी मंत्री अरुणभाई गुजराथी जे काम हे करू शकले असते ते काम आमदार लता सोनवणे करत आहेत.अरुणभाई पाठीवर हात ठेवतात आणि फक्त गोड बोलतात.चोपड्यावर माझे विशेष प्रेम असून ते जळगाव ग्रामीणपेक्षा पाचपट जास्त आहे.आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी विष्णापूर येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारत उपयुक्त ठरणार आहे.
चोपड्यात आमदार लता सोनवणे यांच्या समोर उमेदवार नाही.आम्ही कोरोनात मैदानात होतो.ज्यांनी मागील विधानसभेत चाळीस हजार मतदान घेतले ते हंगामी पुढारी कुठे गेलेत.आम्ही लोकांच्या सर्व सुखदुःखात सामील होतो.शिवसेना पहिल्यापेक्षा नरमली असल्याचे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,विष्णापूर परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे,येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी बाहेरच्या स्पर्धेत टिकावा. या उद्देशाने अडीच एकरात सर्व सोयीसुविधानी युक्त १४ कोटींची इमारत आदिवासी भागात उभारली जात आहे.अशीच इमारत कृष्णापुरसाठी मागणी केली असल्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील असून ३३ पेयजल योजना मंजूर करून घेतल्या आहेत.पुढील तीन महिन्यात तालुक्यात ३०० कामांचे भूमीपूजन करायचं आहे.असे माजी आमदार सोनवणे यांनी सांगितले.यावेळी मेलाणेचे माजी सरपंच प्रताप पावरा यांनी आदिवासी भाषेत मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,आमदारांच्या प्रयत्नांतुन शिक्षणासाठी आदिवासी बांधवासाठी मोठी इमारत बांधली जात आहे.विष्णापूर ते बोरमळी रस्त्याचे काम लवकर होणार असून आमदार लता सोनवणे आदिवासी बांधवासाठी खूप करत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान विष्णापूर येथील काही युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.