नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय लडाख दौरा आयोजित केला आहे. त्यानुसार आज सकाळीच ते लेहमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केले. तसेच चीनलाही इशारा दिला. ‘भारताच्या एक इंचही जमिनाला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही,’ असे ते यावेळी म्हणाले. त्यांनी आज जवानांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबलही वाढवले.
जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिलं जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. परंतु हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही, असे ते लडाखमधील लुकुंग चौकीवर भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित करताना म्हणाले.
‘भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही याची मी शाश्वती देतो,’ असंही ते यावेळी म्हणाले. आम्हाला अशांतता नाही तर शांतता हवी आहे. भारताने कोणत्याही देशाच्या स्वाभीमानावर कधी हल्ला केला नाही. परंतु भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर झाला तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.







