मुंबई, (वृत्तसंस्था) – राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याची राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरुंची भूमिका असल्याचा बोगस दावा उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळ खेळणारे उदय सामंत यांची उच्चशिक्षण मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. कोरोनाचं कारण पुढे करून राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याची राज्यातल्या विद्यापीठाच्या कुलगुरुंची भूमिका असल्याचा बोगस दावा उदय सामंत यांनी केल्याचा गंभीर आरोप आमदार भातखळकर यांनी केला आहे. उदय सामंत यांच्याकडून बेकायदेशीरपणे विद्यापीठांच्या स्वायत्तेत ढवळाढवळ केली जात असल्याने राज्यपालांनी त्यांना मंत्रिपदावरुन काढून टाकावं, असं आमदार भातखळकर यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
काय म्हणाले होते उदय सामंत?
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका गेल्या आठवड्यात स्पष्ट केली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागील काही बैठकींमध्ये राज्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं होतं
आपत्ती व्यवस्थापन समितीशी झालेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर समितीच्या सल्ल्यानुसार राज्य शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. युजीसीकडून परीक्षा घेण्याचा अट्टहास असला तरीही कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळं उदभवणारा संभाव्य धोका पाहता आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सामंत यांनी पत्रकारांनी सांगितलं होतं.
अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांमसमवेत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही कुलगुरुंशी शासन स्तरावर चर्चा झाली. असून, त्यांच्याही आरोग्याचा विचार करत सध्या कोणत्याही परीक्षांचा निर्णय नसल्याचं सामंत यांनी सांगितलं होतं.