मुंबई (वृत्तसंस्था ) ;- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसीएशनने ‘मुंबई T20 लीग’ स्थगित केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशचे चेअरमन मिलींद नार्वेकर यांनी आज गुरुवारी याबाबतची माहिती दिली. सद्यस्थिती पाहता अध्यक्ष विजय पाटील आणि मी पुढच्या सूचना येईपर्यंत ‘मुंबई T20 लीग’ न घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दिली.

देशातील नागरिक कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. देशभरात ऑक्सिजन कमतरता तसंच लसींचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं योग्य नाही. त्यामुळे परिस्थिती पुन्हा सामान्य होईपर्यंत स्पर्धेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुंबई क्रिकेट असोसिएशने सांगितलं आहे. आमच्या क्रिकेटपटूंनी या परिस्थितीत खेळावं अशी आमची इच्छा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे.







