रात्री संदीप महाराजांच्या कीर्तनाला प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) :- कलियुगात नामस्मरण करणे सोपे आहे. भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा सांगितले आहे की, वेगळे काही न करता फक्त उपासना, पूजन आणि भाव याद्वारे मानवाला मोक्षाची प्राप्ती सहज होते, असे प्रतिपादन बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी केले.
येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारी पर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला.
दुसऱ्या दिवशी भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी म्हणाले की, संन्यास घेणे सोपे नसते आणि ते प्रत्येकाच्या नशिबात सुद्धा नसते. संन्यास घेण्यासाठी खूप जन्माचे पुण्य लागते. भगवंताला आपलंसं करून घ्या. ते मानवाला सोपं आहे. माया जर मानवाला चांगल्या कार्यात अडवत असते तर ती माया रोखण्याचे काम भगवंत करतो. मानवामधील दोष, अहंकार भगवंत नाहीसा करतो. माझा विठ्ठल.. राधे राधे..अशा विविध भजनांवर भाविकांनी ठेका धरला. जय – विजय, भगवान विष्णू, चार सनत कुमार यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. कथेनंतर माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर भारती सोनवणे, माजी उपमहापौर सुनील खडके, भरत खडके या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
या कथेत धरणगाव येथील माऊली वारकरी विद्यार्थी संस्थेचे भजनी मंडळ होते. तर गायनाचार्य मयूर महाराज, तरवाडे व ईश्वर महाराज, हतनूर मृदुंगाचार्य मयूर महाराज, खाक्रुंडी यांनी काम पाहिले. गुरुवारी रात्री ८ वाजता वाघळी येथील हभप संदीप महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. ही श्रीमदभागवत कथा आणि कीर्तन हे युट्यूबवर लाईव्ह (https://youtube.com/live/TswLFLM7LdA?feature=share) दाखविण्यात येत आहे. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.