एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयात आवारातून इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी आणि ईलक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयीत चोरट्याना मुद्देमालासह अटक केली आहे.
जळगाव शहरातील मोहाडीरोड वरील असलेल्या शासकीय महिला रुग्णालय येथे अज्ञात चोरट्यांनी रुग्णालयाच्या मालकीचे ३ इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी, ईलेक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी २ मार्च सायंकाळी ६ ते ४ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरून नेला होता. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर आयुष मणियार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास केला. तपास सुरु असतांना सदरची चोरी ही सतबिरसिंग बलवंतसिंग टाक (वय २१, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), गुरुजितसिंग सुजाणसिंग बावरी (वय २२ वर्ष, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), तंजीम बेग नसीम बेग मिर्झा (वय ३६ वर्ष, रा. टिपु सुलतान चौक, तांबापुरा, जळगाव) यांनी केली असल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती.
त्याप्रमाणे संशयितांना तांबापुरा येथुन ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त केली होती. त्यांचे कडुन चोरी झालेल्या साहीत्यापैकी ९७ हजार रु किंमतीचे साहीत्य व गुन्हयात वापरलेली रिक्षा व मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तपासादरम्यान गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याने नरेंद्र मानसिंग पाटील, रा. अयोध्या नगर, जळगाव यांचे कडेस मागील वर्षी घरफोडी केल्याचे कबुली दिलेली आहे. सदर बाबतीत एम.आय.डी.सी. पो.स्टे.ला यापुर्वी गुन्हा दाखल आहे. सदर संशयित सतबिरसिंग याचेवर यापुर्वी चोरी घरफोडीचे १९ गुन्हे, गुरजितसिंग याचेवर ११ गुन्हे तसेच तंजीम बेग मिझा याचेवर ३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, पो.उप.निरी. दिपक जगदाडे, स. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, पो.ना. किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे अशांनी केली आहे.