जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील ममुराबाद येथील २३ वर्षीय तरुणाने पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याच्या रागातून शुक्रवारी ऐन पोळ्याच्या दिवशी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास गच्चीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दि. २२ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ऋषीकेश विजय न्हावी (२३, रा. ममुराबाद, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. ऋषिकेशचे वडील विजय हे शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)तर ऋषिकेश हा मिळेल ते मोलमजुरीचे काम करून घराला हातभार लावत होता. दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्याने पालकांकडे नवीन मोबाईल घेऊन द्या म्हणून हट्ट धरला होता. मात्र परिस्थितीमुळे पालकांनी समजूत काढून त्याला नकार दिला होता. शुक्रवारीदेखील त्याने संध्याकाळी घरी आल्यावर पालकांकडे हट्ट धरला.
काही वेळाने रागाच्या भरात तो गच्चीवर गेला व झोक्याच्या बंगळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने ऋषिकेशची आई गच्चीवर पाहण्यास गेली असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला.(केसीएन)आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने ऋषिकेशला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे ममुराबाद गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत.