रायगड – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात अर्णब गोस्वामी हे जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली होती. तर अधिक तपासासाठी रायगड पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणावरून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच सुरक्षेच्या कारणावरून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात नेण्याचा निर्णय़ पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोझ शेख आणि नितेश सारडा या या प्रकरणातील अन्य आरोपींनाही तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.







