कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या, शिरसोली दरम्यान घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : कर्जबाजारीपणाला कंटाळून प्रौढ व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव ते शिरसोलीदरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश बंडू बडगुजर (६१, मूळ रा. खेडी कढोली, ता. एरंडोल, ह.मु, नवनाथ नगर, जळगाव) असे मयत व्यापाराचे नाव आहे. धान्याचा व्यापार असलेले गणेश बडगुजर यांनी व्यवसायासाठी कर्ज काढलेले होते. या कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
व्यापारी गणेश बडगुजर यांनी मुलाला सोमवारी रात्री व्हिडीओ कॉल करीत आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कुटुंब धास्तावले व काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले. तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, गुलाब माळी घटनास्थळी आले. मात्र तोवर त्यांनी रेल्वेखाली उडी घेतली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.