चाकू हल्ल्यातील कुसुंबा येथिल जखमी तरुणाचा अखेर मृत्यू,
संशयित आरोपींच्या मागावर पोलीस
जळगाव (प्रतिनिधी) : खोटे नगर बस स्टॉप जवळ मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन तरुण एकमेकांसोबत गप्पा मारत असताना गंमतबाजी करीत होते. त्यातील एकाची गंमत होत असताना दुसऱ्या बाजूला उभे असलेल्या त्याच्या मित्रांना पाहवले नाही. त्यांनी गंमत करीत असलेल्या तरुणावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. अखेर त्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असताना आज बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन संशयित मारेकर्यांची ओळख पटवली असून त्यांच्या मागावर आहेत.
अविनाश निंबा अहिरे (वय ३५, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो दुचाकीवर आला होता. त्याच्यासोबत मनोज नामक त्याचा मित्र होता. दोघेही टॉवरची कामे करतात. दोघांमध्ये गप्पा सुरू असताना अचानक अविनाश अहिरे याने मनोज याच्यासोबत गंमतबाजी सुरू केली. गमतीत अविनाश मनोजला मारू लागला. मात्र दुसऱ्या बाजूला उभे असणाऱ्या मनोजच्या मित्रांना वाटलं की, अविनाश मनोज ला मारत आहे.
त्यामुळे संशयित अमोल गवळी आणि साहिल पठाण दोघे रा. पिंप्राळा यांनी अविनाश अहिरे याच्यावर चाकूने हल्ला चढवला. त्यात तो गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याच्यावर रात्री उपचार सुरू होते. दरम्यान आज बुधवारी पहाटे सहा वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून संशयित अमोल गवळी व साहिल पठाण या दोघांच्या मागावर गेले आहेत.
संशयीतांचा शोध सुरूच असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस दलाला वाढत्या गुन्हेगारीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.