नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;-पुढील तीन-चार दिवसांत मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मान्सूनचे आगमन होते. पण तो ३१ मे रोजीच येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तथापि, तीन-चार दिवस मागे-पुढे होऊ शकतात, अशी शक्यताही विभागाने व्यक्त केली. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनेही दोन-तीन दिवसांच्या फरकासह ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
मान्सून सध्या केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. तौक्ते चक्रीवादळादरम्यान आणि त्यानंतर केरळमध्ये जोरदार पाऊस झाला होता. गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या चक्रीवादळाने मान्सूनचा वेग वाढवला होता. बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर म्हणजे २७ ते २९ मेपर्यंत आगमन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ३० मे ते एक जूनदरम्यान आगमनाची शक्यता आहे.