चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी खासदार यांचे नेतृत्व आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावल्यावर आता पक्षाचे सामान्य कार्यकर्तेही जणू आतापर्यंत झालेल्या घुसमटीला आवाज मिळाल्यासारखे जाहीरपणे बोलू लागले आहेत . आमदार मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व प्रभावहीन ठरवण्याच्या काही लोकांच्या प्रयत्नांवर आता टीका केली जाऊ लागली आहे
बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितले की , ‘दुस-यांसाठी काही करायचं असतं…’ हा संस्कार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या बालमनावर कोरला गेला . वडिल रमेशनाना व आई कमलबाई यांनी हे बाळकडूच त्यांना दिले . हिंगोणे खुर्द ते महाराष्ट्राची विधानसभा हा त्यांचा प्रवासच रोमहर्षक आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांनी लौकीक मिळवला कोरोनाकाळात सर्व थांबलं असतांना ‘सदैव धावणारा आमदार’ अशी ओळख त्यांनी निर्माण केली. चाळीसगावच्या राजकारणात त्यांनी दोन वर्षात प्रगतीचे पर्व रुजवले सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन ‘झगडा’ करण्याची त्यांची नेहमी तयारी असते. वयाच्या ३६ व्या वर्षी विधानसभेत चाळीसगावचा आवाज बुलंद करणारे नेतृत्व. असे वलय त्यांच्या नावाभोवती चकाकते आहे.
‘ कोरोना महामारीत या आमदाराने गरजूंसाठी अन्नसेवेची चूल पेटवली. ही अन्नपूर्णा सलग ६२ दिवस लाखों मुखांपर्यंत पोहचली. त्यांच्या संघर्षगाथेत ‘कोरोनायोद्धा’ हे पान जोडले गेले.
शेतक-यांच्या प्रश्नांवर त्यांचे लढवय्ये मन पेटून उठते. कोरोनातील सार्वजनिक टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यातच कशाचीही तमा न बाळगता त्यांनी कापूस व भरडधान्य खरेदी करण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला. कोरोनाकाळात महाराष्ट्राच्या पटलावर झालेले हे पहिलेच आंदोलन.
तालुक्यात गुटखाविरोधी मोहिम उघडत स्वतः जीव धोक्यात घालून रात्रभर पाठलाग करून ६५ लाखांचा गुटखा पकडून दिला व शेतकरी संघातील भरडधान्य खरेदीतील घोळ उघड करत शेतकी संघावर शासनाकडून कारवाई करायला लावली बोगस ज्वारी – बोगस खते यांचे रॅकेटच्या विरोधात वज्रमुठ आवळली. कोणतेही आंदोलन किंवा प्रश्न आर्ध्यावर न सोडता त्याच्या मुळापर्यंत जाऊन यशाचे तोरण बांधण्याची नैतिकता त्यांच्या ठायी आहे.
शेतक-यांच्या वीज तोडणी विरोधातही ते आक्रमक झाले. या आंदोलनात त्यांना १२ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास भोगून आल्यानंतर दुस-याच दिवशी राज्यातील सरकारचे तेरावे घालण्याचे धाडसही त्यांनी दाखवले.
रावळगाव साखर कारखान्याच्या प्रशासनाला वठणीवर आणून शेकडो ऊस उत्पादकांच्या घामाचा पैसा मिळवून दिला. तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर पावलांना उसंत घेऊ दिली नाही. पशुवैद्यकीय पदवीधारकांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर मांडूनच सोडविला. राज्यात सर्वत्र आंदोलनकर्ते शेतकरीपुत्र आमदार असा त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे.
सत्तेच्या वर्तूळात नसतांनाही लोकसंग्रह आणि कार्यकर्त्यांचे भरीव जाळे त्यांनी निर्माण केले. रणरणत्या उन्हात जनावरांसाठी चारा छावणी उभारली. पशुपालकांनाही दुष्काळात अन्नाचा घास भरविला. नापिकी आणि दुष्काळाच्या शापातून तालुक्याची मुक्तता करण्यासाठी सिंचनाचा नांगर फिरवला. ट्रामा केअर सेंटर, असू दे की लोकसहभागातून उभारलेले कोरोना उपचार केंद्र. मंगेशदादांचा दातृत्व कंकण बांधलेला हात सदैव पुढेच राहिला. अत्यवस्थ रुग्णांसाठी त्यांनी याच काळात अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. कोरोना महामारीत त्यांनी स्थानिक रोजगार, व्यापार, उद्योग यांना बळ दिले.
जलसाक्षरता संमेलन, ज्येष्ठ नागरिकांना पंढरपुरस्थित विठूरायाचे दर्शन, गरजू महिला, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीच्या मदतनीस आदि भगिनींना दिलेली प्रेमळ भाऊबीज भेट, शहिद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी सुरु असलेली धडपड, कोरोनाने मृत झालेल्या किर्तनकाराच्या कुटूंबाचे पालकत्व. मंगेशदादांच्या शिवनेरी आणि अंत्योदयच्या गाभारी आलेला कुणीही रिकाम्या हातीने कधी परत जात नाही.
चाळीसगाव न्यायालयाच्या बाजूला विस्तारित इमारतीसाठी चार कोटी ८९ लक्ष रुपयांचा निधी मिळविण्यासह राज्य उत्पादन शुल्क इमारत बांधकामासाठी दोन कोटी ७२ लाख, ट्रामा केअर सेंटर बांधकामासाठी ४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजुर करुन घेतला. लोकसहभागातून कोरोना उपचार केंद्र उभारले. येथे आमदार निधीतून ५० खाटा, प्रायवायू वाहिनी, १०० रॅपिड अँटीजेन कीट, तालुक्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना PPE कीट, ग्रामीण रुग्णालयासाठी १२ हवा शुद्धीकरण प्लाझ्मा फिल्टर, खाटा व वैद्यकीय साहित्य शुद्धीकरणासाठी दोन अल्ट्रा व्हायलेट लाईट, रोग व आग प्रतिबंधात्मक ४५ खाटांसाठी पडदे, मोफत रक्त तपासणी करण्यासाठी यंत्रे, हायमास्ट लाईट्स पोल आदिंसाठी निधीचा ओघ कमी पडू दिला नाही.
चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांसाठी एक कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती. उसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे यासाठी १०० मुलांचे व १०० मुलींचे वस्तीगृह सुरु करण्यास शासनाची मान्यता मिळवली जलक्रांती ते पथक्रांती – शिवनेरी फाउंडेशनच्या भूजल अभियानातून चाळीसगाव तालुक्यात नदी – नाले खोलीकरण व शेतरस्ते दुरुस्तीसाठी मोफत पोकलेन, जेसीबी मशीन उपलब्ध करुन दिले.
निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीना २० लाख रुपये विकासनिधी देण्याचा शब्द दिला होता. तो पहिल्याच वर्षी पाळत तालुक्यातील शिरसगाव, बाणगाव, गोरखपूर, ब्राम्हणशेवगे, मांदुर्णे, मुंदखेडे, हिंगोणे खुर्द येथे प्रत्येकी २० लाखांचे सभामंडप व बोरखेडा खुर्द येथे गावांतर्गत विकासकामांसाठी निधी मिळवून दिला.
आमदार निधीतून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात कोट्यावधींची विकासकामे सुरु आहेत. विरोधी पक्षातील आमदार असूनदेखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत दोन वर्षात काम सुरु असलेली व मंजूर झालेली ४३ कोटी रुपयांची रस्ते व पूल विकास कामे प्रत्यक्षात सुरु देखील केली. जनतेचा विश्वास जिंकत मतदारसंघाचा विकास साधणारा “मंगेश पॅटर्न” चाळीसगावकरांच्या मनात कोरला गेला असल्याचे त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेवरून लक्षात येतो.
चाळीसगाव तालुक्यात अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती ऑगस्टच्या शेवटच्या व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झाली, ढगफुटीसदृश्य पावसामुळे चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ६९ गावांना या महापुराचा फटका बसला.आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आमदार मंगेश चव्हाण यांनी महापुराची बातमी तालुक्यात पोहचत नाही तोपर्यंत प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सतत १५ दिवस पायाला भिंगरी लावून नुकसानग्रस्त चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला कोकण – पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे चाळीसगाव पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी सर्वप्रथम मागणी केली. महापुराच्या दुसऱ्याच दिवशी गरजू ५० बेघर पूरग्रस्तांना ८ दिवसात घर बांधून देण्याचे जाहीर केले व दिलेल्या शब्दाला जागत त्यांना हक्काचे घर देखील ८ दिवसात उभे करून दिले. अनेक गावांचे रस्ते व पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता त्या गावांना स्वखर्चाने जेसीबी आदी उपलब्ध करून देत त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडले. जैन उद्योग समूहासह इतर उद्योगांना विनंती करून पूरग्रस्तांना अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले. महापुरात जनतेसाठी २४ तास फिल्डवर राहून त्यांना आधार देणाऱ्या, वेळेची गरज लक्षात घेत स्वखर्चाने हक्काचे छत व मदत उपलब्ध करून देणाऱ्या जनसेवक आमदारांमुळे संकटात असणाऱ्या तालुक्याला उभारी मिळाली.
अशी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामगिरीची यादीच वाचत त्यांच्या समर्थकांनीही आता खासदारांनी बोलावे अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली आहे.