महावितरणकडून नावात बदलाची ८८४ पैकी ८६२ प्रकरणे निकाली
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यात महावितरणतर्फे सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. यात वीजग्राहकांना तत्काळ वीज जोडणी आणि ग्राहकांच्या नावात बदलांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. जळगाव परिमंडलातही सेवा पंधरवाडा प्रभावीपणे राबविण्यात आला आहे.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात नावात बदल करण्यासाठी ८८४ अर्ज वीज ग्राहकांनी केले होते. पैकी पंधरवाड्याच्या पहिल्याच आठवड्यात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत शंभर टक्के प्रकरणी निकाली काढण्यात आली असून धुळ्यात ८९ तर नंदुरबार जिल्ह्यांत ४१ अर्ज निकाली काढून ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातूनही ७५४ अर्ज होते. ७३२ अर्ज निकाली काढण्यात आली असून २२ अर्जही लवकरच निकाली काढण्यात येतील.
राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा देण्यासाठी अमंलात आणला आहे. त्याची प्रभावी अमंलबजावणी करण्याचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगावचे मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी जळगाव परिमंडलात सेवा पंधरवाडाची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सुचना सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार परिंमडलात घरगुती ग्राहकांना तत्काळ वीज जोडण्या देण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यांत २९४७ प्राप्त अर्जापैकी ९५२ नवीन ग्राहकांना जोडण्या देण्यात आल्या आहेत. १९९५ जोडण्या देण्याचे काम सुरु आहे.
धुळे जिल्ह्यात घरगुती वीजजोडणीसाठी १४४३ जणांचे मागणी अर्ज आहेत, पैकी ८६५ जणांना जोडण्या देण्याचे काम सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यांत ३१३ अर्जापैकी २२० जणांना नवीन घरगुती जोडण्या देण्यात आल्या असून उर्वरित ९३ ग्राहकांनाही जोडण्या लवकरच देण्यात येतील, २८ एप्रिल ते १२ मे २०२५ चा कालावधी सेवा हक्क पंधरवाडा राबविण्यात येत आहे.