पाटना(वृत्तसंस्था ) – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे समोर येत असून दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या सुटकेची मागणी आता सुरू झाली आहे. तेजप्रताप यादव यांनी या पार्श्वभूमीवर आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी ‘आझादी पत्र’ अभियान सुरू केले आहे. राष्ट्रपतींकडे लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेची त्यांनी मागणी केली आहे. याशिवाय, या अभियानात बिहारमधील जनतेने देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
ट्विटद्वारे या संदर्भात तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे की, आपल्याला ज्यांनी बळ दिले, त्यांच्यासाठी ताकद निर्माण करण्याची आज वेळ आली आहे. एका अभियानाशी जोडले जा आणि आपल्या नेत्याच्या सुटकेसाठी मागणी करा. गरिबांचे कैवारी आदरणीय लालू प्रसाद यादव यांच्यासाठी एक ‘आझादी पत्र’ राष्ट्रपती पर्यंत पोहचवा.
तेजप्रताप यांनी हे देखील म्हटले आहे की, खोट्या खटल्यामध्ये माझ्या वडिलांना अडकवले गेले आहे आणि त्यांना आजवर बंदी बनवून ठेवले आहे. मागील अनेक महिन्यांपासून माझे वडिल आजारी आहेत. तरी देखील त्यांना तुरुंगात ठेवले गेले. केंद्राकडून हा राजकीय छळ आहे. एक मुलगा या नात्याने मी संकल्प केला आहे की, त्यांचा आवाज जनमानसांपर्यंत पोहचवायचा आहे. मग माझा जीव गेला तरी हरकत नाही. आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील.