अधीक्षिका पत्नी, सचिवासह तिघांवर गुन्हा दाखल
वस्तीगृहातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
एरंडोल (प्रतिनिधी) : धक्कादायक माहिती एरंडोल तालुक्यातून समोर आली आहे. येथील सरकारी मुलींचे वस्तीगृहातील पाच मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला त्याची अधीक्षिका पत्नी आणि सचिवाने गप्प राहून साथ दिल्याने तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गणेश शिवाजी पंडित असे या नराधम काळजीवाहकाचे नाव आहे. वस्तीगृहातील मुलींची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते. मात्र रक्षकच भक्षक निघाला असे दिसून आले आहे. हे प्रकरण वस्तीगृहातील त्याची अधीक्षिका पत्नी व सचिवाला माहित झाले. मात्र त्यांनी देखील या गंभीर घटनेंकडे कानाडोळा करून एक प्रकारे काळजीवाहक गणेश पंडित याला सहकार्य केले. त्यामुळे या गंभीर घटनेत आता गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रकरण समोर आले आहे.
सदर पाचही मुलींवर ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींचे वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाले आहेत. पाच बालिका तेथील वसतीगृहात अभिरक्षेत असतांना सदर वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनसर्गिक संभोग देखील केलेला आहे. तसेच सदरची माहीती नमुद बालिकांनी संस्थेच्या अधिक्षक व काळजीवाहक गणेश पंडित याची पत्नी अरुणा गणेश पंडित आणि सचिव भिवाजी दीपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) यांना दिली.
घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी त्यांचे कर्तव्य न करता नराधम गणेश पंडित याला मदत करीत सदरची माहीती लपवुन ठेवली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह अधीक्षक महिला अरुणा पंडित यांची विरुद्ध भा.द.वि.क. ३५४, ३७६ (२) (ड) (एन) (क), ३७७, POCSO कलम ३,४,५, ६,८,९,१०,१२, १९, २१, सह अनुसुचीत जाती व जमाती कायदा कलम ३ (१) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पिडीत मुली बालगृहात प्रवेशित असताना सदर मुलींसोबत संस्थेतील काळजीवाहक गणेश पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याबाबत लेखी स्वरूपात तसेच व्हिडिओ शूटिंगमधील माहिती बालकल्याण समिती जळगाव यांना पिडीत बालकांसोबत प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून प्राप्त झाले होते. समितीमार्फत विचारणा केली असता सदर बाब संस्थेचे सचिव व अधीक्षक यांना माहिती असून देखील त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे अत्यंत गंभीर या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी अटकेत आहेत. दरम्यान सर्व पीडित मुलींची जळगाव रिमांड होम येथे रवानगी करण्यात आली आहे. तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.