धरणगाव तालुक्यातील बांभोरी नदीपात्रातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या तसेच तालुक्यातील बांभोरी या गावामधील तरुणाचा गिरणा नदीपात्रामध्ये अज्ञात इसमानी डोक्यात कुऱ्हाड मारून खून केल्याची घटना शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसह एलसीबीचे पथक तपासासाठी कामाला लागले आहे.
आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई-वडील व मोठ्या भावासह शनिपेठ नगर येथे राहतो. त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. दोघेही भाऊ गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. तेथे अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची हत्या केली.
बराच वेळ झाला आकाश घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध झाल्यानंतर काही वेळाने गिरणा नदी पात्रात तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावले, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढमाले तसेच पाळधी पोलीस स्टेशनचा स्टाफ उपस्थित होता.
मयत तरुणाची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत धरणगाव पोलिसांसह एलसीबीचे पथक कामाला लागले आहेत. घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा तुटलेला मोबाईल सापडला आहे. दरम्यान या हत्येमुळे बांभोरी गाव हादरला असून तरुणाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.