शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण
जळगाव (प्रतिनिधी) :शहरातील शिवकॉलनी येथे दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून भोसकून खून करण्यात आल्याची घटना रविवारी २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
अक्षय अजय चव्हाण (वय २३) राहणार पिंप्राळा असे मयताचे नाव आहे. शिव कॉलनी चौकासमोरील दारूच्या अड्ड्यावर त्याचा एकाशी वाद झाला. त्या वादातून बाळा पवार नामक व्यक्तीने त्याला चाकूने भोसकत खून केल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक अरुण धनवडे , पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी पाहणी केली.
जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.
मयत तरुणाचा परिवार मध्य प्रदेशातून जळगावात दहा वर्षांपूर्वी स्थायिक झाला होता. पिप्राळा येथे मढी चौक ते राहत होते. मयत अक्षय हा जैन इरिगेशन येथे कामाला होता.
.