वाहतूक कोंडी सुटण्यासह अपघात प्रमाण कमी होण्याची अपेक्षा
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महामार्गावरील वाहतुकीची मोठी समस्या असलेल्या खोटे नगर चौकात अखेर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. रविवारी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या हस्ते या अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना महामार्ग ओलांडताना होणाऱ्या त्रासातून सुटका मिळणार असून, अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.
खोटे नगर चौक हा महामार्गावरील एक अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना महामार्ग ओलांडणे अत्यंत धोकादायक बनले होते. या नव्या सिग्नलमुळे वाहतुकीचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. उद्घाटन प्रसंगी आ. सुरेश भोळे यांनी सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “खोटे नगर चौकातील सिग्नलची मागणी अनेक दिवसांपासून होती. आज ती पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांना आळा बसेल.” यावेळी अतुल बारी, डॉ. चंद्रशेखर पाटील, शक्ती महाजन, विजय पाटील, प्रतिभा पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सिग्नल यंत्रणेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आ. सुरेश भोळे यांच्या या कामाबद्दल आभार मानले आहेत.