मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडून पाहणीवेळी सूचना
जळगाव (प्रतिनिधी) :- खरीप हंगाम २०२५-२६ दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर व पर्याप्त प्रमाणात खतांचा पुरवठा होण्यासाठी जळगाव जिल्ह्यात युरिया व डीएपी खतांचा बफर साठा उभारण्यात आलेला आहे. दि. १२ जून रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या बफर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून साठवणूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळचे विभागीय व्यवस्थापक सुनिल इंगळे उपस्थित होते. करनवाल यांनी साठवणूक केलेल्या युरिया व डीएपी खतांच्या पिशव्यांवरील माहिती, साठवणूक पद्धती, वितरण व्यवस्था, रेक पॉईंट व वाहतूक व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. साठवणूक नियमानुसार सुरक्षित, स्वच्छ आणि योग्य प्रकारे ठेवण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवर, पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी खत वितरणात कोणताही विलंब होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असेही करनवाल यांनी यावेळी नमूद केले.