यावल तालुक्यातील परसाडे येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील परसाडे गावी गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी खळवाडीला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. आगीत एक बैल जळून खाक झाला, तर दुसरा ९० टक्के भाजला असून मृत्यूशी झुंज देत आहे. यासोबतच शेती अवजारे, बैलगाडी आणि गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या या दुर्घटनेत चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
परसाडे बुद्रुक गावात राहणारे प्रभाकर शंकर पाटील आणि आशाबाई शंकर पाटील यांच्या मालकीच्या खळवाडीत आग लागली. त्यांची बैलगाडी, शेती उपयोगी अवजारे आणि चारा देखील आगीत जळून खाक झाले. यामुळे पाटील कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आग विझवण्यासाठी यावल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीने बोलावण्यात आले. तसेच, गावचे सरपंच पती डॉ. राजू तडवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी मदत केली. तलाठी आणि सर्कल यांनी पंचनामा करून तो महसूल प्रशासनाकडे पाठवला आहे. परसाडेचे सरपंच मीनाताई तडवी, अतुल भालेराव, रमेश साबळे, प्रल्हाद डालू चौधरी, रोशन तडवी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर पाटील हे बैलजोडी भाड्याने देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.