जळगाव ( प्रतिनिधी ) – माझी वसुंधरा अभियान टप्पा 2 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज झाली.

यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे (सा.प्र.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा. लोखंडे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एस.टी. धीवरे, कार्यकारी अभियंता (ग्रा पा पू) जी एस भोगावडे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जबाबदारी वाढल्याचे सांगून पंचमहाभूतांवरिल घटकांवर कामकाज करण्याचे आवाहन केले. सरपंच आणि ग्रामसेवक यांची भूमिका महत्त्वाची असून गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष सनियंत्रण ठेवण्याबाबत सूचना केल्या.उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी घनकचरा व सांडपाणी याचे महत्त्व पटवून दिले ग्रामपंचायतीला दोन हजार झाडांचे ध्येय ठेवून त्याची निगराणी राखण्याबाबत सूचना केल्या.उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे यांनी प्रत्यक्ष कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
समारोप प्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि रा लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे व शशिकांत साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनुष्यबळ व विकास सल्लागार महेश सोनवणे होते, सूत्रसंचालन मनोहर सोनवणे यांनी केले.प्रशिक्षणासाठी कक्ष अधिकारी ऋषिकेश भदाणे यांनी कामकाज पाहिले.







