जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना जारी केल्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) – नगरपालिका कर वसूलीसाठी प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करण्यात यावी. वसूलीसाठी तृतीयपंथीयांचीही मदत घेण्यात यावी. २८ फेब्रुवारीपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसूली थकीत राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. वार्डनिहाय वसूली मोहीम शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. टुडी बारकोडला प्रसिध्दी देणे, घंडागाडीच्या माध्यमातून प्रसिध्द देण्यात यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यमापनासाठी केआरए पध्दत सुरू करण्यात यावी. १५ जानेवारी २०२४ पर्यंत बचतगटांची स्थापना पूर्ण करण्यात यावी. बचतगटांना पैसे देतांना त्यांची सर्व पात्रतासह यादी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामात गतिमानता व पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. नगरपालिकास्तरावर सुरू असलेली विविध विकासकामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्याव्यात, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सूचना दिल्या की, पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेले आठ रस्त्यांची कामे पाठपुरावा करून सुरू करण्यात यावीत. धरणगावमध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करून शास्त्री मार्केटचा विषय मार्गी लावावा. शेंदूर्णीमधील विकासकामांचा ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव पाठविण्यात यावा. नगरपालिका शाखेने नशीराबादमधील २१ कामांच्या प्रशासकीय मान्यता तात्काळ द्याव्यात. यावल व चाळीसगाव मधील घनकचरा प्रकल्पाचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे.
भूसावळ व चाळीसगाव नगरपालिकेतील अनुकंपा भरती ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी. बोदवड नगरपालिकेने एसटीपी प्रकल्प या महिना अखेर मार्गी लावावा. माझी वसूंधरा अभियानात जिंकण्याच्या ईर्षने सहभागी व्हावा. पाचोऱा शेतकी संघ नियमानुसार सोडविण्यात यावा. नगरपालिकांनी लिलावाबाबतचे सर्व प्रस्ताव ५ जानेवारीच्या आज पाठवावेत. बँकाबरोबर समन्वय साधून नगरपालिकांनी १० जानेवारीपर्यंत निधीचे वितरण करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम, स्वनिधी, प्रधानमंत्री समृध्दी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील कर्ज प्रकरणातील प्रस्ताव १५ जानेवारीपर्यात मंजूर करण्यात यावीत. प्रधानमंत्री आवास योजनेत कामे सुरू असलेल्या ठिकाणांना ३१ डिसेंबरपर्यंत भेट द्यावी. २८ फेब्रुवारीपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. कर्मचारी संघटनांबरोबर बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत. माझी वसुंधरा सारखा स्वच्छ सर्वेक्षणसाठी एक आराखडा तयार करण्यात यावा.
न्यायालयात वेळेत शपथपत्र दाखल करण्यात यावे. कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांची साईट व्हिजीट करण्यात यावी. या साईट व्हिजीटमध्ये कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. २६ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्यात यावेत. काम पूर्ण झाल्यावर निधी मागणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.